Power by The Web Cloud Media

परमात्म्याच्या बोधाने मनातील समस्त भ्रम दूर होतात

सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

नवी मुंबई

“परमात्म्याचा बोध प्राप्त झाल्यास मनातील समस्त भ्रम दूर होतात आणि त्याच्याशी प्रेम केल्याने खऱ्या भक्तीला सुरवात होते व जीवन आनंदमय होऊन जाते. असे आनंदी जीवन प्राप्त झालेला मनुष्य तो अलौकिक आनंद स्वत:पर्यंत सीमित न ठेवता प्रत्येकाला वाटण्याचा प्रयत्न करत असतो.” असे उद्गार निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवारी खारघर, नवी मुंबई येथील सेंट्रल पार्क नजिक असलेल्या सिडको मैदानावर विशाल रूपात आयोजित केलेल्या एक दिवसीय निरंकारी संत समागमामध्ये व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या जिल्ह्यांतील हजारों निरंकारी भक्तगण सहभागी झाले आणि त्यांनी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य दर्शनाबरोबरच त्यांच्या अमृतमय प्रवचनाचा आनंद प्राप्त केला.

सद्गुरु माताजींनी सांगितले की, या जगामध्ये मनुष्य जन्मात आल्यानंतर परमात्म्याला जाणून स्वत:ची ओळख करुन घेणे हा वास्तविक जीवन उद्देश आहे. जेव्हा आपल्याला परमात्म्याची ओळख होते तेव्हा आमचे मन सहजच त्याच्याशी अनुसंधान साधते आणि मनामध्ये परिवर्तन घडून येते. ही प्रक्रिया अगदी सहजपणे घडते, त्यासाठी कोणताही वेगळा प्रयास करावा लागत नाही. खरं तर कोणतेही अन्य सायास अथवा प्रयास करुन मनामध्ये परिवर्तन घडून येणे शक्य देखील नाही.

सद्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले, की परमात्माचे दर्शन घेतल्यानंतर त्याची निरंतर जाणीव ठेवल्याने मनामध्ये मानवी गुण उत्पन्न होतात. मन निर्मळ होते आणि त्याचा आप-पर भाव निघून जातो. कोणाबद्दल मनात वाईट विचार येत नाहीत. असे जीवन जगणारा मनुष्य संतत्वाने युक्त होतो आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत बनून जातो.

सत्गुरू माताजींनी पुढे सांगितले, की जेव्हा आम्ही स्वत:ला सावरतो तेव्हा जग आपोआपच सुधारत जाते. आवश्यकता इतकीच आहे, की सावरण्याची किंवा सुधरण्याची सुरुवात आपण स्वत:पासून करावी. याउलट कोणी दूसरा चूक करत आहे ती पाहून आपणही चूक करणे उचित नाही. वास्तविक पाहता परमात्म्या समवेत प्रत्येकाचे व्यक्तिगत नाते असते. भक्ती हा प्रत्येकाचा स्वतंत्र प्रवास आहे. दुसऱ्याची नक्कल करुन आपल्याला आनंदाची अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी आपण स्वत:चे अंत:करण या परमात्म्याशी जोडायवे लागेल. त्यानंतरच वास्तविक आनंदाची अनुभूती प्राप्त होईल.

शेवटी, सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जशा प्रकारे प्रकाशाचे आगमन होताच अंधार दूर होतो तशाच प्रकारे मनामध्ये परमात्म्याच्या ज्ञानाचा उजेड आल्योबरोबर अज्ञानरुपी अंधार नाहीसा होतो. मग हे मन अहंकारापासून मुक्त होते आणि त्यामध्ये सकारात्मक विचार प्रवेश करतात.

या संत समागमामध्ये सर्व भाविक-भक्तगणांनी कोरोना कालखंडानंतर प्रथमच सद्गुरुचे साकार रुपात दिव्य दर्शन प्राप्त केले ज्याची प्रतीक्षा ते बऱ्याच कालावधीपासून करत होते. सद्गुरुचे दिव्य दर्शन प्राप्त झाल्याने सर्वांच्या हृदयात कृतार्थ झाल्याची आणि सद्गुरुच्या प्रति कृतज्ञता प्रकट करणारी भावना होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *