Power by The Web Cloud Media

शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही

माजी आमदार सुभाष भोईर

कल्याण

शिवसेनेने अनेक हिवाळे, पावसाळे बघितले. अनेक बंडखोरांनी शिवसेनेला आव्हान द्यायचा प्रयत्न केला. मात्र तो कधीही यशस्वी झाला नाही. आताही झालेल्या बंडाचा काडीमात्र फरक पडणार नाही. आता संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. विजय हा सत्याचाच होणार आहे, असा विश्वास कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख, माजी आमदार सुभाष भोईर यांनी व्यक्त केला.

कल्याण पूर्वेत पार पडला शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण पूर्वेत शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्या प्रमुख आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

पूर्वेतील महाड तालुका मराठा समाज सेवा संघ हॉलमध्ये निर्धार मेळावा झाला. यावेळी जिल्हा महिला संघटक विजया पोटे, महानगरप्रमुख विजय साळवी, राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, हर्षवर्धन पालांडे, शरद पाटील, रमेश जाधव, आशा रसाळ, राधिका गुप्ते, शीतल मंढारी, रजवंती मढवी यांच्यासह शिवसेनेचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाष भोईर म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थपणे पुढे नेत आहेत. सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शिवसेनेत आजवर दोन-तीन वेळा बंडखोरी झाली, पण शिवसेना खंबीरपणे उभी राहिली आणि वाढलीही. कोणी कितीही वल्गना केल्या तरी शिवसेनेवर कब्जा करायची कुणाचीही हिंमत नाही, असा इशारा सुभाष भोईर यांनी दिला.

दरम्यान या निर्धार मेळाव्यात कल्याण पूर्वेतील आम आदमी पार्टीच्या काही महिला पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *