Power by The Web Cloud Media

Kalyan : पुलवामा पुस्तक प्रकाशन सोहळा

कल्याण

लेखकाची प्रतिभासृष्टी वाचकांसमोर मांडल्यामुळे वाचकांच्या मनोशिखरावर त्याचे परिणाम होत असतात. म्हणून प्रभावी व्यक्तीचित्रण,वातावरण निर्मिती,रोमांचक वातावरणशैली, संवादशैली, वास्तवदर्शी पात्रांचे चित्रण करणे हे लेखकांच्या लेखनाचे कौशल्य असते असे मत प्रमुख पाहुणे मा.श्री.महेश केळुस्कर यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित डॉ.प्रा.चंद्रशेखर भारती लिखित ‘पुलवामा’ कादंबरी प्रकाशन सोहळा वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला.  प्रमुख पाहुणे महेश केळुस्कर आपले मनोगत व्यक्त करतांना पुढे असेही म्हणाले की, आपला देश, धर्म, जात, पंथ, भाषा श्रेष्ठ आहे असा दहशतवाद आसपासही असतो हीच जाणीव करून देणारी पुलवामा ही कादंबरी असून जगाच्या खुल्या बाजारावर संकेत करणारी उत्कंठावर्धक कादंबरी असून डॉ. प्रा. चंद्रशेखर भारती यांनी मराठी साहित्यात भर घातली असे प्रतिपादन केले. कादंबरीची ओघवती भाषा शैली, एकाच चौकटीत न अडकता अत्यंत वेगळ्या विषयावरील कादंबरी लेखन असून ‘पुलवामा’ या घटनेवर साहित्यातील पहिलाच अविष्कार असून डॉ. प्रा. भारती यांना शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदनही केले.

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी कादंबरीकार डॉ. प्रा. भारती यांचा सन्मान केला. कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक निरंजन पाटील, डॉ.गिरीश लटके, रंगकर्मी सुधीर चित्ते, शिवा इंगोले, यशवंत बैसाणे, अॅड. शंकर रामटेके, अॅड. नागेश कांबळे, प्रा.युवराज मेश्राम, रमेश मोरे, नितीन वानखेडे, रोहिणी जाधव, डॉ. अलका पवार-शिंदे तसेच रसिक वाचक या वेळी उपस्थित होते. अत्यंत दिमाखदार पद्धतीत पुलवामा या कादंबरीचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *