नव उद्योजकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन
अंबरनाथ
गुर्जर समाजाच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने गुर्जर उद्योग परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून आयोजित या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजकांना एकत्र आणून उद्योगवाढीच्या संधी, सरकारी योजनांचा लाभ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवसाय वृद्धीच्या संकल्पनांवर चर्चा करणे हे होते.
या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच अंबरनाथ MIDC चे अध्यक्ष उमेश तायडे यांनी उद्योगवाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वास दिला. प्रसिद्ध उद्योगपती एस. आर. पाटील यांनी उद्योग क्षेत्रातील संधी आणि आपले अनुभव शेअर केले.
याशिवाय, अशोक पाटील, समाधान पाटील, पन्नालाल पाटील आणि बाबन पाटील यांनी उद्योगवाढीच्या संधींवर चर्चा करत समाजातील तरुणांना उद्योग क्षेत्रात उतरायला प्रोत्साहित केले. फार्मास्युटिकल उद्योगात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रिया पाटील यांनी औषध व्यवसायातील नवसंशोधन आणि उद्योगातील संधींवर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात सीमाताई पवार यांनी नवीन उद्योग धोरणे, लघु व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना तसेच महिलांसाठी असलेल्या व्यवसायवाढीच्या संधी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे अनेक नवउद्योजकांना योग्य दिशा मिळाली.
गुर्जर उद्योग परिषदेच्या माध्यमातून समाजातील उद्योजकतेला चालना मिळून नवउद्योजकांसाठी नवे मार्ग खुले होण्यास मदत होणार आहे.
आणखी बातम्या
गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर
सातरस्ता येथे निरंकारी भक्तांचे रक्तदान
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण