Power by The Web Cloud Media

कल्याण : म्हणून केली शाहरुखने हत्या

खडकपाडा पोलिसांनी पाच तासात केला हत्येचा उलगडा

खडकपाडा पोलिसांनी पाच तासात केला हत्येचा उलगडा

कल्याण

एका मुलीवरून आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेल्या वादातूनच अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करून त्याच्याच मित्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शहाड परिसरातल्या बंदरपाडा येथील शेतात घडली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी पाच तासात हत्येचा उलगडा करून शाहरूख उर्फ इमरान यासीन शेख (२०, रा. टिटवाळा) याला अटक केली.

काही दिवसांपूर्वी भिवंडी शहरातून शाहरूखने एक मुलगी पळवून आणली होती. यावरून मृत अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्रांचे आठ ते दहा दिवसांपूर्वी शाहरुखसोबत भांडण झाले होते. २४ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास शाहरुख मृत मुलासोबत बंदरपाडा परिसरात असलेल्या शेतात आला. याठिकाणी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून शाहरुखने अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली.

सदर घटनास्थळी पोलिसांना प्राप्त झालेल्या मोबाईल फोनवरून मृत मुलाचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर गोपनीय माहिती व तांत्रिक कौशल्याच्या आधारे शाहरूखला टिटवाळा परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. मृत मुलगा व त्याच्या मित्रांसोबत शाहरूखचे आठ-दहा दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून हत्या केल्याची कबुली शाहरुखने खडकपाडा पोलिसांना दिली.

खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे, सपोनि अनिल गायकवाड यांच्यासह सुनील पवार, जितेंद्र ठोके, डोमाडे, देवरे, एस. पाटील, लोखंडे, श्रीरामे, बूधकर, कामडी, खांबेकर, थोरात, बोडके, तागड, देसले, वारघडे या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *