तहसीलदार युवराज बांगर यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी
कल्याण
जुन्या मुंबई पुणे महार्गावरील दहिसर ते शिळफाटा दरम्यान महामार्गालगत प्रचंड अतिक्रमण झाली आहेत. यांमुळे तब्बल ३२ नैसर्गिक नाले बंद झाले असल्याने नाल्यांमधील पाणी हे महामार्गावर येऊन अपघातांची मालिका सुरु झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी पाहणी करून या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती. यानंतर बुधवारी ठाणे तहसीलदार युवराज बांगर यांच्या दालनात संयुक्त बैठक घेण्यात आली होती. आमदार पाटील, तहसीलदार बांगर यांनी सर्व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी पाहणी केली असून लवकरच कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिल आहे.
आमदार राजू पाटील यांनी केला पाठपुरावा
जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या अतिक्रमणांवर आता हातोडा पडणार आहे. दहिसर ते शिळ फाटा दरम्यान असलेल्या ३२ नैसर्गिक नाल्यांचे पुनर्जिवीकरण करण्याचा निश्चय आमदार पाटील यांनी केला आहे. नैसर्गिक नाले बंद असल्याने नाल्यांमधील पाणी हे पावसाळयात महामार्गावर येऊन अपघात घडत आहेत. तर भंगार माफियांकडून रासायनिक पाणी हे कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडले जाते. यांमुळे १४ गावातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जाऊन शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, हे रसायन मिश्रित पाणी १४ गावांमध्ये जात असल्याने विहिरी आणि बोअरवेलच पाणी देखील प्रदूषित झाले आहे. त्यामुळे १४ गावांची प्रदूषणामधून मुक्तता आणि वाहनचालकांची अपघातांच्या गर्तेतून मुक्तता करण्यासाठी मनसेचे आमदार पाटील यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.
महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्याचं तहसीलदारांचे आश्वासन
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी अधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व प्रशासक, आयआरबी. कंपनीचे अधिकारी यांसह १४ गाव सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, मनसेचे जिल्हा अध्यक्ष हर्षद पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील, शिवसेनेचे ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील आणि अन्य जणांच्या उपस्थितीत महामार्गावरील समस्या या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. लवकरच महामार्गावरील अतिक्रमण दूर करण्याचं आश्वासन तहसीलदार युवराज बांगर यांनी दिल आहे.
दरम्यान, कल्याण शिळ रोडवरील वाहतूक कोंडीस अडथळा ठरत असलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बुधवारी झालेल्या बैठकीत देखील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला होता. वाहतूक कोंडी होत असल्याने आणि शासनाच्या कामात अडथळा ठरत असलेली बांधकामे तोडण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
आणखी बातम्या
राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघ विजेता
झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबवा : आमदार चव्हाण
‘छावा’ चित्रपट पाहून डोंबिवलीकरांच्या डोळ्यात अश्रू