Power by The Web Cloud Media

कल्याण : जरीमरी नाल्यातील गाळ नाल्यातच

यंत्रसामुग्रीद्वारे सफाई करण्याची मनसेची मागणी

कल्याण

पावसाळ्याच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे जोरात सुरु आहेत.. मात्र, पश्चिमेतील जरीमरी नाल्यातील गाळ काढून नाल्यातच टाकला जात असल्याचा आरोप मनसेने केला असून मोठे नालेसफाई करतांना यंत्रसामुग्री वापरणे आवश्यक असतांना मजूरांद्वारे हा नाला साफ केला जात आहे. त्यामुळे या नाल्याची यंत्रसामुग्री द्वारे साफसफाई करण्याची मागणी मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पॅनल क्र. १४ मधील जरीमरी मोठा नाला, काळा तलाव, एचडीएफसी बँक, मल्हारनगर, जरीमरी, झुंजारराव मार्केट, स्टेशन रोड, एपीएमसी मार्केट येथून जाणारा मोठा नाला यांची पावसाळ्या अगोदर साफसाफाई होणे अत्यंत गरजेचे आहे. मागील वर्षी या नाल्याच्या ज्या पद्धतीने साफसफाई करण्यात आली ती पुरेशी नव्हती. कारण पुराचे पाणी मल्हारनगर, जरीमरी, बैलबाजार आदी भागातुन परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्याची कोणत्याही स्वरुपात भरपाई शासन स्तराव अद्याप मिळालेली नाही.

पावसाळा १० दिवसांवर आला असताना नाले सफाईचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून मोठ्या नाल्यांची यंत्रसामुग्रीने सफाई करणे आवश्यक असतांना नाल्यात मजूर उतरवून हि नालेसफाई केली जात आहे. हे मजूर नाल्यातील गाळ काढून नाल्यातच टाकत असल्याचा आरोप मनसेने केला असून यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पावसाळ्याच्या दहा दिवस अगोदर नाले सफाईचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही ते पूर्ण झाले नसून त्वरीत योग्य पद्धतीने नालेसफाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *