झाडे कोसळली, वाहनांचे नुकसान
कल्याण
गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने कल्याण शहराची अक्षरशः दाणादाण उडाली. अवघ्या दहा मिनिटांच्या या वादळामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. जोरदार वाऱ्यासोबत आलेल्या धुळीच्या लोटांमुळे रस्त्यांवर धुरळा उडाला आणि दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.
दिवसभर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी चारच्या सुमारास अचानक वातावरणातील बदलाचा अनुभव आला. काही क्षणांतच आकाशात धुळीचे ढग दाटून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्याने शहराला जोरदार तडाखा दिला. परिस्थिती इतकी गंभीर होती की अनेक वाहनचालकांनी रस्त्याच्या कडेला वाहने थांबवून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला.
वादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडे थेट रस्त्यावर आणि घरांवर कोसळली. पश्चिमेकडील रामदासवाडी, मोहने आणि बिर्ला कॉलेज परिसरासह पूर्वेकडील नांदिवली भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या छतावरील पत्रे उडाल्याने परिसरातून जाणाऱ्या वाहनांवर ती पडून नुकसान झाले. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोसळलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
वादळ काही मिनिटांत शांत झाले असले तरी त्या दहा मिनिटांनी कल्याणकरांची चांगलीच धावपळ उडवली.













Leave a Reply