पिसवली स्मशानभूमीत महिलांच्या हस्ते वृक्षारोपण
कल्याण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत कल्याण पूर्वेतील पिसवली येथे महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद ठाणे व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कल्याण ग्रामीण ह्याच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सेस अंतर्गत महिला मेळावा घेण्यात आला.

आजच्या कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन किती महत्वाचा आहे हे लोकांना समजलं असून, स्मशानभूमीत आलेल्या लोकांना सावली मिळावी, तसेच झाडाप्रमाणे मुलीचे पालन पोषण करावे, “बेटी बचाव, बेटी पढाव” हा संदेश लोकांपर्यंत पोहचावा म्हणून माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी सपत्नीक व अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उषा लांडगे यांच्यासोबत पिसवली येथील स्मशानभूमीत आंबा, पेरू, बदाम, नारळ ही झाडे लावली. चुल व मुल यापलीकडे जाऊन महिला खऱ्या अर्थाने सक्षम होणे गरजेचे आहे. याकरिता महिला ‘सक्षमीकरण काळाची गरज’ ह्या विषयावर आधार इंडियाच्या रक्षा तबिब यांनी माहिती दिली.
तसेच आरोग्य व कोरोना लसीकरण या विषयावर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आरोग्य विभाग पीएचएन जयश्री पाटील यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, महिला पदाधिकारी, महिला ग्रामपंचायत सदस्या, बचत गटप्रतिनिधी, पर्यवेक्षिका उषा लांडगे उपस्थित होत्या. कार्यक्रमाकरिता पिसवली येथील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे सहकार्य लाभले. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने मास्क सॅनिटायजर व सुरक्षित अंतर ठेवून कमीतकमी लोकांच्या उपस्थित सदर कार्यक्रम पार पडला.













Leave a Reply